■ झुंजार सेनापती l प्रतिनिधी
अभिनेते प्रकाश राज यांनी केंद्र सरकारच्या विविध निर्णयांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, असा आरोप करत त्यांनी सरकारच्या आश्वासनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रकाश राज म्हणाले की, नोटबंदीनंतर सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. कोरोना काळात लोकांना थाळ्या वाजवायला आणि ‘गो कोविड गो’ म्हणायला लावण्यात आले, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केली.
तसेच २ कोटी रोजगार, १०० स्मार्ट शहरे आणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा आरोप करत जनतेची फसवणूक करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. सामान्य नागरिकांकडून ‘गब्बर सिंग कर’ वसूल करण्यात आला, तर श्रीमंत उद्योगपतींना करसवलती देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकार देश चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून आता नागरिकांनाच त्याग करण्याचे आवाहन केले जात असल्याची टीकाही प्रकाश राज यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.



