⬤ झुंजार सेनापती l मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीसाठी लोकप्रतिनिधींनी शक्य तितका पर्यावरणपूरक प्रवास करावा, असे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुचाकीवरून विधानभवनात येत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री विधानभवनात आले होते. त्यांच्या या आगमनाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे .
मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर सामाजिक माध्यमांवरून उपरोधिक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. रोज विविध दौऱ्यांसाठी हेलिकॉप्टरचा वापर करणारे मुख्यमंत्री अचानक दुचाकीवर दिसल्याने अनेकांनी “हा पर्यावरणाचा संदेश की प्रसिद्धीचा देखावा?” असा सवाल उपस्थित केला आहे.
राज्यातील सामान्य नागरिक वाढत्या पेट्रोल दरांमुळे त्रस्त आहेत. त्यातच लोकल रेल्वे आणि बसमधील प्रचंड गर्दीत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नेत्यांची एक दिवसाची दुचाकी सफर ही केवळ छायाचित्रापुरती मर्यादित असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
“खरंच सामान्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर एक दिवस लोकल रेल्वे आणि बसने प्रवास करून दाखवा,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा संदेश देणे योग्य असले, तरी तो केवळ प्रतीकात्मक न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवा, अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.



