⬤ झुंजार सेनापती l मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींनी पर्यावरणपूरक प्रवासाचा अवलंब करावा, असे आवाहन केल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मोटारसायकलवरून विधानभवनात येत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या आगमनाची दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात पालखी मार्गाच्या पाहणीसाठी बसने प्रवास केला. वाहनांचा मोठा ताफा टाळत सामान्य प्रवाशांप्रमाणे बसमधून प्रवास करून त्यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
तर मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात पायी चालत येत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कृतीचीही सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा सुरू झाली असून अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
राज्यात वाढती वाहतूक कोंडी, इंधन दरवाढ आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून करण्यात आलेल्या या प्रतीकात्मक कृतींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र या गोष्टी केवळ एका दिवसापुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत सातत्याने दिसायला हव्यात, अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.



