झुंजार सेनापती | मुंबई
महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना नोटीस देऊन एक महिन्याची मुदत दिली जाणार असून, या कालावधीत मराठी न शिकल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
मुंबई महानगर क्षेत्रात ३,९९५ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६०४ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळले. राज्यातील इतर भागांत ४,२२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे राज्यभरात एकूण १,२६८ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
“महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नसून प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ही विशेष तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत राज्यभर सुरू राहणार असून, तपासणीदरम्यान चालकांच्या व्यवहारिक मराठी ज्ञानाची पडताळणी केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना सुधारण्याची संधी दिली जाणार असली, तरी विहित मुदतीनंतरही नियमांचे पालन न केल्यास बॅज निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.



