झुंजार सेनापती l मुंबई
आखाती भागात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्याबाबत देशात चिंता व्यक्त केली जात असली तरी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईपद्वारे मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची कोणतीही कमतरता नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शक्य असल्यास नागरिकांनी एलपीजी गॅस सिलिंडरऐवजी पाईपद्वारे मिळणाऱ्या पीएनजी गॅसचा वापर करावा, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.
देशातील सुमारे ६० लाख कुटुंबांना त्यांच्या परिसरात पाईप गॅसची सुविधा उपलब्ध असून ही कुटुंबे सहजपणे पीएनजीकडे वळू शकतात, असे सरकारने सांगितले. पीएनजीमुळे सिलिंडरची प्रतीक्षा, वाहतूक व साठवणूक यांसारख्या अडचणी टाळता येतात तसेच स्वयंपाकासाठी सतत गॅस उपलब्ध राहतो.
या पार्श्वभूमीवर गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना नागरिकांना पीएनजी जोडणी मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील गॅस वितरण केंद्राशी संपर्क साधून पाईप गॅस जोडणीसाठी अर्ज करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आखाती भागातील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर दबाव निर्माण होण्याची शक्यता असली तरी देशात पाईप गॅसचा पुरेसा साठा असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे



