झुंजार सेनापती l प्रतिनिधी
माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीवरून पेटलेला वाद अखेर शांततेच्या मार्गाने निकाली निघाला असून चौथ्याच दिवशी गाव पूर्णपणे तणावमुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा व धनगर समाजामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे हा वाद मिटवण्यात यश आले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत मोहोळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा रात्री निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही समाजांच्या शिष्टमंडळांनी सकारात्मक भूमिका घेत सध्याची जागा ही खेलोबा देवस्थानाची असल्याचे एकमुखाने मान्य केले. त्यामुळे सध्याच्या ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवीन जागा निश्चित करण्यासाठी दोन्ही समाजांचे प्रतिनिधी एकत्रितपणे पाहणी करणार असून ग्रामस्थांच्या सहमतीने योग्य ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे. या नव्या ठिकाणी भव्य उभारणी व सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.
या वादामुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. जिल्हाधिकारी कार्तिकेयन व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे स्वतः गावात फिरून जागा निश्चित करणार असून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, या निर्णयामुळे अंजनगावात शांतता प्रस्थापित झाली असून दोन्ही समाजांनी संयम राखत घेतलेल्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. गावातील वातावरण आता निवळले असून सामाजिक ऐक्याचा संदेश या तोडग्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.



