झुंजार सेनापती l मुंबई
प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यावर कोणताही प्राप्तिकर आकारला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी करत शेतकरी व भूधारकांना मोठा दिलासा दिला आहे.
या निर्णयामुळे देशभरातील भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. पालघर जिल्ह्यात सध्या बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, दिल्ली-अलिबाग मार्गिका तसेच वाढवण बंदर यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन करण्यात येत असून, मोबदल्यावर आकारल्या जाणाऱ्या प्राप्तिकरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत होता.
या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला होता. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मंत्रालयाने भूसंपादन मोबदला पूर्णपणे प्राप्तिकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला.
तसेच, मोबदल्याच्या रकमेतून कोणताही टीडीएस कपात केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, यामुळे शेतकरी व भूधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



