झुंजार सेनापती l प्रतिनिधी l मुंबई : ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले. मातोश्री ग्राम समृद्धी योजना आणि मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा मंत्रालयात आढावा घेताना त्यांनी अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याचे आदेश दिले.
मंत्री गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध जिल्ह्यांतील रोजगार हमी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये नोंदणीकृत मजूर संख्या, सुरू असलेली कामे, प्रलंबित मंजुरी, निधी वापर तसेच शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती यावर चर्चा झाली.
यावेळी बोलताना मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले की, केंद्र शासनाने व्ही.बी.जी. राम जी अधिनियम २०२५ मंजूर केला असला तरी तो अद्याप अंमलात आलेला नाही. त्यामुळे मनरेगा योजना पूर्ववत सुरू असून सर्व कामे नियमानुसार आणि वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
राज्य शासनासाठी शेत-पाणंद रस्त्यांची कामे अत्यंत प्राधान्याची असल्याचे सांगत त्यांनी मंजूर कामांची अंदाजपत्रके तातडीने तयार करून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना दिल्या. तसेच वर्ककोड तयार करून कार्यारंभ आदेश आणि हजेरीपत्रके तत्काळ निर्गमित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
सुरू असलेल्या कामांची उर्वरित हजेरीपत्रके तातडीने काढून मोजमाप पूर्ण करावे आणि देयके ‘नरेगासॉफ्ट’ प्रणालीवर विनाविलंब नोंदवावीत, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या मागण्या लक्षात घेऊन शासनाने शेत-पाणंद रस्त्यांची अनेक कामे मंजूर केली आहेत. या कामांच्या अंमलबजावणीस क्षेत्रीय स्तरावर अधिक गती देण्याची गरज असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस रोजगार हमी योजना विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.



