झुंजार सेनापती l लातूर
लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे कर्तृत्ववान व संघर्षशील नेतृत्व होते. त्यांची कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती. त्यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कृष्णा खोऱ्यातील ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी यापूर्वीच मंजुरी दिली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता गोदावरी खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच लातूर शहर विस्तारीत पाणी पुरवठा योजना आणि जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
लातूर येथे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री विक्रम काळे, संभाजी पाटील-निलंगेकर, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अभिमन्यू पवार, रमेश कराड, संजय केणेकर, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती.
लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व दिवंगत गोपीनाथरावराव मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत होती. आज जिल्हा परिषदेच्या आवारात दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. दिवंगत विलासराव देशमुख यांचाही पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात आहे. या दोन्ही मित्रांची स्मारके एकाच आवारात आहेत, हा अनोखा योगायोग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
विरोधी पक्षनेता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवंगत गोपीनाथराव मुंडे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. गृह खाते त्यांनी सांभाळले, त्यांच्या काळात मकोका कायदा आणला गेला. गुन्हेगारी दहशतीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
बिकट परिस्थितीतही आपल्या विचारांवर ठाम राहण्याची शिकवण दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी दिल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी त्यांनी आंदोलने केली. सर्व समाजासाठी दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे हक्काचे घर होते. त्यांची शिकवण अंगिकारली पाहिजे. केंद्रात त्यांना अल्पकाळ केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या अल्पकाळातही त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखविली. त्यांना मोठा कार्यकाळ मिळाला असता तर वेगळे चित्र दिसले असते. असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.