मुंबई l विलास कोळेकर
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील मालेवाडी गावच्या मनीषा सोनाबाई सदाशिव नलावडे यांची अपर उपआयुक्त (Additional Deputy Commissioner) पदी पदोन्नतीवर राज्य गुप्तवार्ता विभाग,महाराष्ट्र राज्य,मुंबई येथे नियुक्ती झाली आहे. नुकताच सदर पदाचा पदभार त्यांनी घेतला आहे.
अत्यंत प्रतिकुल परस्थितीवर मात करुन त्यांनी ही गरुडझेप घेतली आहे. मालेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवीचे शिक्षण, पुढे जवळच्याच तांदुळवाडी येथील पंडीत नेहरू हायस्कूल मध्ये आठवी ते दहावीचे शिक्षण व पुढे इस्लामपूर येथील कन्या महाविद्यालयात उर्वरित शिक्षण पुर्ण केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन १९९६ मध्ये पी. एस. आय. म्हणून त्यांची एम पी एस सी कडून नियुक्ती झाली. आपल्या सेवेत सतत अ श्रेणी त्यांनी संपादन केली आहे.त्याना त्यांचे सेवाकाळात त्यानी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा.पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह,राष्ट्रपती पदक, राष्ट्रीय गरुडझेप अवार्ड आणि इतर अनेक बक्षिसे मिळाली आहेत.
या नियुक्ती नंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या, आज मी कुठे उभी आहे हे महत्वाचे नाही, तर मी इथे कशी आणि कोठून आले आहे हे महत्वाचे आहे. ज्याने आपले ध्येय लवकरात लवकर निश्चित केले आहे आणि सातत्याने त्या ध्येय पुर्तीसाठी प्रयत्न केला तर त्याला यशाला गवसणी घालणे अशक्य नाही.आजपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मदत केली,विविध प्रसंगी साथ दिली आहे त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
मालेवाडी गावात ही बातमी पसरताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.गावातील माजी सरपंच व धडाडीचे कार्यकर्ते श्री रंगराव जाधव म्हणाले, मनिषाताईची वेळ घेवून लवकरच संपुर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्काराचे आयोजन करीत आहोत. मालेवाडी गाव शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्यामुळे देशभर प्रसिद्ध आहे. या निवडीमुळे परत एकदा या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.श्री विलासराव कोळेकर यांनीही या नियुक्ती बद्दल खुप आनंद झाल्याचे स्पष्ट केले. व भविष्यात मालेवाडी गाव अधिका-यांचे गाव कसे होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत मालेवाडी करांनी शेतीची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली व प्रगती केली. मात्र शिक्षणामुळेच प्रगतीची दारे उघडतात.म्हणून गावातील मुलासाठी शिक्षणाची विशेष आवड निर्माण करुन प्रगतीचा मार्ग ते कसा धरतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.