झुंजार सेनापती l मुंबई
दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग आणि सतर्क असले पाहिजे. कान आणि डोळे बनून सुरक्षेचे काम केले पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिवीजा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल पीस ऑनर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख डॉ. सदानंद दाते, एनएसजी कमांडो सुनिल जोधा, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा ग्लोबल पीस ऑनर सन्मानाने गौरवण्यात आले.

26/11 या काळजाला भिडणाऱ्या घटनेला 17 वर्षे झाली असली तरी त्या दिवसाची वेदना आजही आपणा सर्वांच्या मनात कायम असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईसह देशभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली देण्यासाठी आणि हुतात्म्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. पहलगाम येथे निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवादी संघटना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा घटनांवरून आजही दहशतवादाचा धोका कायम असल्याचे स्पष्ट होत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 26/11 चा हल्ला हा ताज किंवा मुंबईपुरता मर्यादित नव्हता. जसा अमेरिका ’ट्विन टॉवर’ हल्ला म्हणजे अमेरिकेच्या सार्वभौमत्वावरील हल्ला होता, तसाच 26/11 चा हल्ला हा संपूर्ण भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेला मोठा धक्का होता. त्या काळात ठोस प्रतिउत्तर दिले असते तर कदाचित पुन्हा असा हल्ला झाला नसता. परंतु आता परिस्थिती बदलली असून भारत मजबूत, सक्षम आणि निर्णायक देश म्हणून जगासमोर उभा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करत जगाला आपली क्षमता दाखवून दिली. भारत निर्णायक कारवाई करणारा देश आहे. आज देशाची सुरक्षा यंत्रणा अत्यंत मजबूत झाली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ आणि शस्त्रे जप्त करून मोठा कट उधळून लावला आहे.
दहशतवादी सरळ युद्ध करू शकत नाहीत म्हणून छुपे युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाने सतत जागरूक राहणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे, मेजर उन्नीकृष्णन आणि प्रकाश मोरे यांसह सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन करतो.



