झुंजार सेनापती l मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतर एअरक्राफ्ट अपघात तपास ब्युरो यांचा २२ पानी प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात कमी दृश्यमानतेत उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळेच दुर्घटना घडल्याचा ठपका वैमानिकावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ही दुर्घटना मानवी चुकांमुळे घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे.
अहवालानुसार, दुर्घटनेच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात हवामान अत्यंत प्रतिकूल होते. धुके आणि कमी दृश्यमानता यामुळे धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. अशा परिस्थितीत उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विमानतळावरील काही आवश्यक सुविधा अपुऱ्या असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हवामानाची अचूक माहिती देणारी यंत्रणा आणि मार्गदर्शन साधनांची कमतरता असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
मुंबईहून बारामतीकडे येत असताना उतरण्याच्या अंतिम टप्प्यात ही दुर्घटना घडली होती. दुर्घटनेनंतर सुरुवातीपासूनच विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. काही जणांनी ही साधी दुर्घटना नसून घातपात असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणाची चौकशी एअरक्राफ्ट अपघात तपास ब्युरोसोबतच गुन्हे अन्वेषण विभाग आणि नागरी उड्डाण महासंचालनालय यांच्या स्तरावर सुरू आहे. प्राथमिक अहवालात आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना नागरी उड्डाण महासंचालनालयाला देण्यात आल्या आहेत.
अंतिम अहवाल प्रसिद्ध होईपर्यंत दुर्घटनेचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित होणार नसली, तरी प्राथमिक निष्कर्षांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दुर्घटनेमागील सर्व बाबींची सखोल छाननी करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.



