झुंजार सेनापती l मुंबई
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis हे स्वतः सातत्याने विविध प्रशासकीय यंत्रणांशी संपर्कात असून केंद्र सरकारशीही सतत समन्वय साधत आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री Girish Mahajan यांना समन्वय कार्यात विशेष लक्ष घालण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आखाती देशांतील भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकार यांच्याशी समन्वय साधून महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुबई येथील Indian People’s Forum यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने मदतीसाठी विशेष संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. ज्यांना तातडीची मदत, माहिती किंवा नोंदणी करावयाची आहे त्यांनी खालील संदेश सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : +97150 365 4357
राज्य सरकारने नागरिकांना घाबरून न जाता अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. केंद्र व राज्य सरकार समन्वयाने काम करत असून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले जात आहे.



