spot_img
spot_img

नागपुरात संरक्षण तंत्रज्ञानाचा मोठा प्रकल्प; रोबोटिक्स व मानवविरहित विमान केंद्र उभारणीला सुरुवात

झुंजार सेनापती l मुंबई
जगातील संरक्षण क्षेत्र झपाट्याने बदलत असून नव्या जागतिक व्यवस्थेची निर्मिती होत आहे. व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर होत असलेल्या या काळात ज्या देशाकडे सामरिक शक्ती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल तोच देश भविष्यात आघाडीवर राहील. भारत या दिशेने वेगाने वाटचाल करत असून देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सोलर समूह करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मिहान विशेष आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या रोबोटिक्स आणि मानवविरहित विमान निर्मिती केंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल तसेच राघव नुवाल व हर्ष नुवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकेकाळी संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात स्पष्ट धोरण नसतानाही सोलर समूहाने सातत्याने या क्षेत्रात काम केले. आज या समूहाने देशातील आघाडीच्या संरक्षण उत्पादन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान असो किंवा पिनाका रॉकेटसारखी प्रणाली असो, देशाच्या सामरिक क्षमतेला बळकटी देण्यात या समूहाचे मोलाचे योगदान आहे.
बदलत्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, अर्धसंवाहक परिसंस्था आणि क्वांटम तंत्रज्ञान यांचे महत्त्व वाढत असल्याचे सांगत त्यांनी राज्य शासनाने संरक्षण तंत्रज्ञान, एरोस्पेस आणि डीपटेक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण तयार केल्याची माहिती दिली. या धोरणांतर्गत सोलर समूहाकडून होत असलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘राष्ट्रप्रथम’ या विचारातून सोलर इंडस्ट्रीजची वाटचाल सुरू असून या क्षेत्रातील विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

Related Articles

जनादेश, विचारधारा आणि सत्तेची भूक

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजप-शिवसेना युतीला बहुमताचा कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र लढत जनतेकडे मतांची...

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!