झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची खातरजमा केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक यांनी सांगितले की, रिक्षा व टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषा म्हणजेच मराठीचे ज्ञान असणे हा नियम पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांत अनेक चालकांना मराठीत संवाद साधता येत नसल्याच्या तसेच मराठी बोलण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, ज्या प्रदेशात आपण राहतो त्या ठिकाणची भाषा शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर राज्यांत व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर राखणेही तितकेच आवश्यक आहे.
यामुळे १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.



