झुंजार सेनापती l पुणे
लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती मदत करीत आहेत. शासनदेखील अशा धर्मादाय प्रकल्पांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल. रुग्णालयाकडे येण्यासाठी पुरेशा रुंदीचा रस्ता आणि पाण्याची सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल. धर्मादाय संस्थांच्या इमारतींना परवानगी देताना आकारल्या जाणाऱ्या प्रीमियमवर काही प्रमाणात सूट देण्याचा विचारही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
लता मंगेशकर मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने नांदोशी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या रुग्णालय प्रकल्पाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मंजुषा नागपुरे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज प्रत्येक व्यक्तीला उत्तम प्रकारची परवडणारी आरोग्य सुविधा मिळण्याची गरज आहे. धर्मादाय संस्था या क्षेत्रात कार्य करताना बऱ्याचदा असे प्रकल्प चालविण्यासाठी त्यात व्यावसायिकता दिसून येते. मात्र त्यासोबत सेवाभाव कसा असावा हे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दाखवून दिले आहे. हाच अनुभव लता-आशा रुग्णालय प्रकल्पाच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या रुग्णालय प्रकल्पात विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती, रुग्ण पुनर्वसन केंद्र आणि कर्करोग केंद्र असल्याने रुग्णांवर चांगले उपचार होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मंगेशकर कुटुंबाने संगीतसेवेसोबत देशाभिमान बाळगून देशसेवेचे कार्य केले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाच्या संकटामध्ये आपल्याकडून काय करता येईल असा विचार करून अनेकांना मदत करणारे हे कुटुंब आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांवर ट्रस्टतर्फे उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयाने सेवेचा सौदा न करता सेवाभाव कायम ठेवून लाखो रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले. हेच कार्य नव्या रुग्णालय प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे नेण्यात येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
दिवंगत आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंगेशकर कुटुंबाने जीवनभर स्वरांची सेवा केली आहे. आशाताईंनी जीवनातील कटू अनुभवांना सकारात्मकतेत परिवर्तीत केले. जीवंतपणा ठासून भरलेले त्यांचे व्यक्तीमत्व होते, त्यांनी कधीही नकारात्मकतेला जवळ येऊ दिले नाही. वयाच्या नव्वदीत तीन तासांची मैफल करणे अलौकिक असल्याचेही फडणवीस म्हणाले.



