झुंजार सेनापती l मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने चोंडी गावाचा सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे. दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून चोंडीला आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ, चोंडी येथील जतन, संवर्धन आणि विकास आराखड्याबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जलव्यवस्थापनावर विशेष भर
चोंडी येथील स्मृतिस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी ६८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या अंतर्गत भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठाचा विकास, आधुनिक संग्रहालय, खुल्या आकाशाखालील रंगमंच आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत. परिसरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जलव्यवस्थापनावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
परिसराचे सौंदर्य जपत हरित क्षेत्र आणि मोकळ्या जागांचा समतोल राखावा, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले. बुडीत बंधाऱ्यांऐवजी बॅरेज उभारण्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंदिर परिसरातील भूसंपादन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येणार असून, प्रकल्पातील काही सुविधा उभारणी व देखभालीसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करण्याचा सकारात्मक विचार सुरू असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
रस्ते विकासालाही गती
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३६० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पातील दोन कामांना प्रारंभ आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त मोजणी पूर्ण केली असून सीमांकन निश्चित करण्यात आले आहे.
चोंडीचा विकास टप्प्याटप्प्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, चोंडी विकास आराखड्यात इतिहास, संस्कृती आणि पर्यटन यांचा समन्वय साधून स्थानिक विकास व रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच सौंदर्यीकरण, जलसौंदर्य, हरित क्षेत्र आणि पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारून चोंडीला एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे.



