झुंजार सेनापती l मुंबई
महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ अखेर राज्यातील रस्ता अपघातांतील मृत्युदरात घट नोंदविण्यात आली आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात ३३,००२ रस्ता अपघात झाले असून त्यात १४,०६६ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातांत १४,१८५ मृत्यू झाले होते. अपघातांची संख्या २१८ ने (०.६६ टक्के) वाढली असली तरी मृत्यूंची संख्या ११९ ने (०.८३ टक्के) घटली आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही अपघाती मृत्यू ८२ वरून ६१ वर आले असून २६ टक्के घट झाली आहे. अपघातांची संख्या देखील ६६ वरून ५४ इतकी कमी झाली आहे.
नागपूर, पालघर, अमरावती, पुणे, धुळे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अपघाती मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सन २०३० पर्यंत रस्ता अपघात ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.



