झुंजार सेनापती l मुंबई
मुंबईतील ससून मासेमारी बंदराला जागतिक दर्जाचे आणि आधुनिक बनविण्यासाठी फिनलंड देशातील तीन कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे ससून गोदीचे रूपांतर स्वच्छ, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित मासेमारी बंदरात होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मुंबईतील ताज पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात फिनलंड देशातील हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रिसायकल या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमाला मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपाले, फिनलंडचे महावाणिज्यदूत एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, सहाय्यक सजू नायर तसेच फिनलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीखालील जुनी ससून गोदी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतील नवीन गोदी आज मच्छीमारांसाठी महत्त्वाचे आर्थिक केंद्र ठरली आहे. येथे सुमारे १,५६० नोंदणीकृत मोटार चालित मासेमारी नौका असून दरवर्षी साधारणपणे ५० ते ६० हजार मेट्रिक टन मासेमारी उत्पादन होते. त्यामुळे ससून गोदी महाराष्ट्र तसेच देशाच्या मासेमारी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
गेल्या काही वर्षांत ससून गोदीत जाळी दुरुस्ती शेड, कार्यशाळा, भूमिगत पाण्याच्या टाक्या, पाणीपुरवठा वाहिन्या, पंपगृह, संरक्षण भिंत, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सुरक्षा रक्षक कक्ष, कचरा व्यवस्थापन तसेच विद्युत उपकेंद्राचे बांधकाम अशी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. सध्या बर्फ निर्मिती प्रकल्प, घाटाच्या भिंतीचे मजबुतीकरण, मच्छीमारांसाठी विश्रांती कक्ष आणि आधुनिक लिलाव सभागृहाची कामे सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या कराराअंतर्गत ससून मासेमारी बंदर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर, टाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे पुनर्निर्माण तसेच जाळी दुरुस्ती व्यवस्थेची क्षमता वाढविण्यासाठी या कंपन्या मदत करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार ससून गोदीला जागतिक मानकांनुसार आदर्श मासेमारी बंदर बनविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत मंत्री राणे यांनी मच्छीमारांच्या कल्याणासाठी, मासेमारी पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी आणि किनारी भागाच्या शाश्वत विकासासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच ससून गोदी मच्छीमारांच्या प्रगतीचे, नावीन्याचे आणि आर्थिक समृद्धीचे प्रतीक बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.



