झुंजार सेनापती l मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे संभाव्य एल निनो च्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत येणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी तातडीच्या आणि ठोस उपाययोजनांचे आदेश देण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे सौम्यीकरण करण्यासाठी सर्व विभागांनी तत्काळ समन्वय साधून प्रभावी अंमलबजावणी करावी. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना वेग आणि जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन यावर विशेष भर देण्याचे आदेश त्यांनी दिले.
जलयुक्त शिवार योजना आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना या योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत वित्त विभागाला त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
पाणी बचत आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
पशुधनासाठी चारा टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना देताना, राज्यातच वैरण विकास कार्यक्रम राबवण्यावर भर देण्यात आला. विशेषतः सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांमध्ये चारा उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
या बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषि राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच कृषी, मदत व पुनर्वसन, वित्त, जलसंपदा आणि नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



