झुंजार सेनापती l मुंबई
पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल तसेच राज्याच्या सकल उत्पन्नात किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुरंदर विमानतळ प्रकल्पातील बाधित सात गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा केवळ प्रवासी नव्हे तर कार्गो विमानतळ असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्यात येईल. रेडीरेकनरऐवजी वाटाघाटीद्वारे दर ठरविण्यात येणार असून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल. तसेच युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जाईल. विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.



