⬤ झुंजार सेनापती l मुंबई
यंदाचा उन्हाळा अत्यंत भीषण ठरला असून आगामी पावसाळा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे पुढील वर्षी पाणीटंचाई आणि उष्णतेची तीव्रता आणखी वाढू शकते, अशी चिंता Raj Thackeray यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे म्हणाले की, राज्यात आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून विकासाच्या नावाखाली निसर्गाचा समतोल बिघडवला जात आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून याचा फटका पुढील पिढ्यांना बसणार आहे.
“आज जशी लहान मुलांना प्राणिसंग्रहालयात नेऊन प्राणी दाखवावे लागतात, तशीच परिस्थिती भविष्यात झाडांच्या बाबतीत निर्माण होऊ शकते. झाडे इतकी दुर्मिळ होतील की मुलांना ती दाखवण्यासाठी विशेष ठिकाणी घेऊन जावे लागेल,” असे वक्तव्य त्यांनी केले.
पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत, विकासकामांसोबत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणीय असंतुलनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



