⬤ झुंजार सेनापती | बीड l प्रतिनिधी
बीड तालुक्यातील खडकी घाट व तांदूळवाडी घाट परिसरातील शेतकरी सध्या विद्युत मोटारी आणि केबल वायर चोरीच्या वाढत्या घटनांमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. रात्रीच्या वेळी शेतातील तसेच तलाव परिसरातील विद्युत मोटारी, स्टार्टर, केबल वायर व इतर कृषी साहित्य चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
आधीच शेतीतील वाढते उत्पादन खर्च, अनियमित पाऊस आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या चोऱ्या आणखी डोकेदुखी ठरत आहेत. अनेक शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे पिकांचेही नुकसान सहन करावे लागत आहे.
या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आज परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने नेकनूर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिसांनी रात्रीच्या वेळी नियमित गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, चोरीच्या घटना रोखण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर तीव्र लोकआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.



