⬤ झुंजार सेनापती | बीड : बालाघाटावरील नेकनूर परिसरात केबल चोरांनी मोठा धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल ५० ते ६० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल वायर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बालाघाट परिसरात शेतातील विद्युत मोटारींच्या केबल वायर चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, एकाच रात्री पाच ते सहा गावांतील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
चोरट्यांनी नेकनूर, खडकी घाट, चाकरवाडी, सफेपूर, तांदळवाडी, वैतागवाडी आदी गावांतील शेतांमध्ये घुसून विद्युत मोटारींच्या केबल वायर लंपास केल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था ठप्प झाली असून पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच आज सकाळी संबंधित शेतकरी संपादक सोमनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेकनूर पोलीस ठाण्यात एकत्र आले. त्यांनी ठाण्याचे एपीआय मंगेश साळवे यांना निवेदन देत केबल चोरी करणाऱ्या टोळीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात नियमित पोलीस गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली.
यावेळी विविध गावांचे पोलीस पाटील, सरपंच आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान एपीआय मंगेश साळवे यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करत चोरीच्या घटनांचा गांभीर्याने तपास करण्यात येईल, रात्रीची गस्त वाढवून आवश्यक उपाययोजना तातडीने राबविल्या जातील तसेच आरोपींना लवकरच जेरबंद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनामुळे उपस्थित शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
सतत वाढत असलेल्या केबल चोरीच्या घटनांमुळे बालाघाट परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, आरोपींना तातडीने अटक करून अशा घटनांवर कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्याची मागणी संपादक सोमनाथ पाटील यांनां केली आहे.



