⬤ झुंजार सेनापती l मुंबई
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पंढरपूर कॉरिडॉर’ प्रकल्पाची घोषणा केली. दरवर्षी वाढणाऱ्या भाविकांच्या गर्दीला सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कॉरिडॉरमुळे मंदिर परिसरात अधिक मोकळी जागा उपलब्ध होईल, दर्शन व्यवस्था सुलभ होईल, स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे आणि भाडेकरूंनाही योग्य व्यवस्था मिळेल. भविष्यात कितीही भाविक आले तरी त्यांच्या दर्शनासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील.
यावर्षी आषाढी वारीने नवा उच्चांक गाठल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, दर्शनासाठी तब्बल २५ किलोमीटर लांबीची रांग लागली होती. तरीही वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत आनंदाने दर्शन घेतले. चंद्रभागा नदी आणि वाळवंट परिसरातील स्वच्छता व व्यवस्थापनाबद्दलही त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकरी हिताच्या निर्णयांचाही उल्लेख करत ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. वारकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व सौ. प्रभावती माने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवास पास प्रदान करण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पर्यावरण, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.



